Monday, September 15, 2008

पैशासाठी आपलेच घुसवताय परप्रांतियांनाः राज ठाकरे

पुण्याच्या आजूबाजूला ज्यांनी हजारो एकर जमीन घेतली आहे. त्यांना परप्रांतीय विद्यार्थ्यांचा ज्यांना पुळका सुटला आहे. आपल्या जमिनी विकण्यासाठी त्यांना उप-यांची मदत होते. शिक्षणासाठी आलेला राज्यात आलेला आपलं कायमचं बस्तान येथं बसतो. पैशासाठी आपलेच अशा परप्रांतियांना घुसवत असल्याचा टोला शरद पवार यांचं नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारला.

मराठी विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशात प्राधान्य मिळावे यासाठी मनसेने गेल्या आठवड्यापासून ४६ शिक्षण संस्थाविरोधात आंदोलन पुकारले आहे. त्या विषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या लोकांमुळे यापूर्वी मुंबईची वाट लागली आहे. आता पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांची वाट लागणार आहे. जो तरुण शिक्षणासाठी महाराष्ट्रात येतो. त्याला कॅम्पस इंटरव्हूवद्वारे इथेच नोकरी मिळते. नोकरी मिळाल्यावर घर विकत घेऊन तो इथचं आपलं बस्तान मांडतो. हजारो एकरमध्ये उभारलेल्या आपल्या स्कीम खपवण्यासाठी या परप्रांतीयांचा उपयोग होतो. त्यामुळे याला सर्वस्वी आपले माणसे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

परप्रांतीय विद्यार्थ्यांमुळे राज्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, या मुद्याला हात घालत राज ठाकरे म्हणाले, शिक्षणाचा धंदा करायचा असेल तर काढा, महाराष्ट्राचं ग्लोबल टेंडरच काढा ! मागासलेल्या राज्यातली म्हणून जे विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात ते ४० ते ५० लाख रुपये डोनेशन भरून प्रवेश घेतात. त्यावेळी हा पैसा कुठू आणला आहे. याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. पाटणा आणि लखनौ मध्ये तर येथील शिक्षणाच्या धंद्याच्या पाट्या लावल्या जातात.

आता अॅडमिशनची लिस्ट जाहीर होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. लिस्टमध्ये जर मराठी मुलांना प्राधान्य दिले नाही तर पुन्हा मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

No comments: